Thursday, April 10, 2008

बातमी म्हणजे काय हो देवा?

आषाढी एकादशीच्या दिवशी (भारतीय सौर 4 श्रावण शके 1929, आषाढ शुक्‍ल एकादशी, गुरूवार, दि. 26 जुलै 2007) अंमळ लवकरच उठिलो. शौचमुखमार्जनादी प्रातःक्रिया उरकिल्यानंतर ताटलीभर साबुदाणा खिचडी हाणिली आणि कोपभर कषायपेय प्राशन केले. येणेप्रकारे तरोताजा झाल्यानंतर दरवाजात फडफडत असलेला ताज्या वृत्तपत्रांचा ढिग आत घेतला.
(येथे सांगण्यास हरकत नाही, की एक अल्प मुदतीची गुंतवणूक म्हणून हल्ली आम्ही किमान साडेतीन किलो वृत्तपत्रे घेतो! पूर्वी जेव्हा आम्हांस कचेरीतून वृत्तपत्रांचे बिल मिळत नसे तेव्हा घेत नव्हतो. आता घेतो. बिल मिळू लागले म्हणून नव्हे, तर वृत्तपत्रांचे भाव घसरिले म्हणून! आंग्लभाषिक वृत्तपत्र तर रोजी सहा आण्याला एक पडते. अशा खूप वृत्तपत्रांची वर्गणी भरावी. मग दोन महिन्यांनी रद्दी विकावी आणि महिन्याचे रेशन आणावे अशी ही आमची सर्वंकष गुंतवणूक योजना आहे.)

खाटेवर गुंडाळिलेल्या गादीस टेकूनी आम्ही वाचनाचे लाईफगार्ड (वाचाल, तर वाचाल! इति दिनकर गांगल, द्वारा ः ग्रंथाली.) कार्य करीत बसलो. एरवी वृत्तपत्रे वाचिताना आम्ही नेहमीच झपुर्झून जातो. पण आज लोकसत्ता वाचिताना काहीतरी खूप बिघडल्यासारखे वाटत होते. म्हणजे बघा, सर्व आंग्लभाषिक वृत्तपत्रांतील छायाचित्रे पाहूनी आम्ही ती नीट घडी घालून एका बाजूस ठेवोनी दिली. (यांचा रद्दीचा भाव जास्त असतो!) मग मटातील हसा लेको व चकोर वाचिले. मग समीर, अरूंधती आणि देविका या त्रिकोणात घडणारी रोहिणी निनावे यांची हृदयस्पर्शी मालिका - तू सुखी राहाचा पुढील एपिसोड मनःपूर्वक वाचिला. सौभाग्यवतींशी त्यावर उद्‌बोधक चर्चाही केली व त्यावरील प्रश्‍नाचे उत्तर शोधूनी काढले. तद्‌नंतर मुंबई सकाळचे दोन्ही अग्रलेख (देवाशप्पथ!) वाचिले. मग बराच काळ रांगोळी पाहावी तद्‌वत सकाळचा ले-आऊट पाहात बैसलो! मग बघु या मुंबई सकाळमध्ये आज कुठल्या-कुठल्या इंग्रजी दैनिकांतील बातम्यांचा पाठपुरावा घेतलेला आहे हे पाहात बैसलो! (सातवीत असताना आम्ही नकाशात गावांची नावे ओळखण्याचा खेळ खेळायचो. आता या वयात ते बरे न दिसे. तेव्हा मग आम्ही एक नवाच खेळ शोधून काढिला, की मुंबई सकाळ घ्यायचा आणि त्यातील बायलाईन स्टोऱ्या कुठल्या बरे आंग्लभाषी दैनिकाने आधीच छापिलेल्या आहेत हे हुडकूनी काढायचे! यात आम्हांला आश्‍चर्य वाटते ते याचेच, की मिरर, मिड-डे, एचटी, डीएनए, टैम्सॉफिंडिया या वृत्तपत्रांना कसे काय बोआ कळते की ही ही बातमी चार दिवसांनी सकाळमध्ये येणार आहे! आधीच छापून टाकितात लेकाचे त्या बातम्या! काही वृत्तपत्रीय नीतिमूल्येच राहिली नाहीत या आंग्ल दैनिकांत!)
त्यानंतर मग काय चाललेय मराठवाड्यात असे म्हणत मुंबईतला लोकमत वाचिला. मग आहेत का केतकर इंडियात असे म्हणत लोकसत्ता डोळ्यांपुढती घेतिला आणि आम्ही एकदम क्‍नफ्युजच झालो!

आपण लोकसत्ता वाचित आहोत की लोकमानस हेच समजेनासे झाले! चाळीशीची काच बनियनने पुसून घेतिली व पुन्हा पाहिले, तरी संभ्रम कायम! म्हटले, हे आपण वाचित आहोत ते वृत्तच आहे ना? दिसते तर बातमीच. मथळा होता "पाहुण्या तीन टिंब पाहुण्या, मग खालच्या ओळीत परत ये उद्‌गारचिन्ह' तिस बायलाईनही होती ः सुरेंद्र हसमनीस. (पाहा अगर वाचा - लोकसत्ता, दि. 26.7.7, पृष्ठ 1)

हसमनीस म्हणजे नारायण राणे मुख्यमंत्री असताना ज्यांच्या डोंबोलीच्या घरी गेले होते ते. चंदुअंकल ठाण्यात गेल्यानंतर जे टाकोटाक लालबागेस परतिले ते. तुम्हांस सांगतो, पागोट्याकडं पाहात धोतर फेडणारी बातमी लिहावी ती हसमनीसांनी!
अवघ्या पश्‍चिम महाराष्ट्राचे राजकारणी तोंडपाठ असणारा हा माणूस!
पण कचेरीतल्या राजकारणाने मागे राहिला! (असे ते व राजू कुलकर्णी व राहुल बोरगावकर म्हणतात!!)

पण "पाहुण्या तीन टिंब पाहुण्या, खालच्या ओळीत परत ये उद्‌गारचिन्ह' याला का बातमी म्हणायचे देवा?
तीही पहिल्या पानावरची बातमी?
आज मिसिंगची बातमी छापलीत, उद्या जाहीर नोटीसा छापाल! तमाम नागरिकांना कळविण्यात येते की, माझे अशील हे... ऐसे.
आणि याला आम्ही बातमी समजून वाचावयाचे?
पण मग नजरेसमोर सुधीरपंत जोगळेकरजी आले. आणि वाटले सामाजिक समरसतेत कमी पडत असल्याने आपलेच तर काही चुकत नाही ना?

आता आम्ही काही रानडे इन्स्टिट्युटमध्ये (पुण्याच्याच नव्हे, तर ह. भ. प. संजय रानडे यांच्या संस्थेतही) पत्रकारितेचे शिक्षण घेतलेले नाही. त्यामुळे बातमी म्हणजे काय, उलटा पिरॅमिड कसा असतो, बातमी कशाची होते वगैरे ब्रह्मज्ञान आम्हांस असणे शक्‍यच नाही, हे सपशेल मान्य. तेव्हा अखेर आपलाच हा अज्ञानअंधःकार हे ओळखूनी अत्यंतिक शरणागत भावनेने आम्ही म्हटले, की असेल बोआ ही सुद्धा बातमीलेखनाची नवोन्मेषशाली अभिनव पद्धत!!

आणि एकदा हे मान्य केल्यावर मग पुढचे अवघेचि सोपे झाले!
कालच्या लोकसत्तेत आषाढी वारीची बातमीच नव्हती. आजच्या (भारतीय सौर 4 श्रावण शके 1929, आषाढ शुक्‍ल एकादशी, गुरूवार, दि. 26 जुलै 2007) लोकसत्तेत आषाढी वारीची बातमी आहे ती मागूनी दुसऱ्या पानावर (पृष्ठ क्रमांक 10). त्याचवेळी "विवा' या सुबक इस्टमनकलर पुरवणीत "फॅशनपंढरीची वारी यंदाही...' हा विचारप्रक्षोभक लेख मात्र आहे. तर आठ लाख लोकमान्य लोकशक्ती जेथे एकत्र येते त्या वारीबद्दल अशी ही आस्था कोठून, कशी व कशामुळे येते, असे प्रश्‍नही मग आम्हांस अजिबात पडिले नाहीत!
व आम्ही सुखेनैव लोकसत्तादी वृत्तपत्रे वाचू लागिलो!

बोला... पुंडलिका वरदा हारी विट्टल....

हॅप्पी आषाढी!!

2 comments:

Abhijit Bathe said...

आईशपत (उद्गारवाचक चिन्ह)
अल्टिमेट (दोन उद्गारवाचक चिन्हं)
आणखी काही बोलण्याएवढी माझी ’पहोंच’ नाही असं ’सिन्सियरली’ वाटायला लागलंय (तीन उद्गारवाचक चिन्हं)

Yogesh said...

विसोबाशेठ,

कुर्निसात!