Friday, May 30, 2008

हॅपी बर्थ डेची गोष्ट

वृत्तपत्रसृष्टीच्या गौरवशाली इतिहासात जून महिन्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण की याच मासोत्तमात "लोकसत्ता'च्या कमनीय आणि सप्तरंगी "विवा'चा, तसेच "सकाळ'च्या सचित्र आणि रंगीत "टुडे'चा जन्म झाला. या दोन पुरवण्यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे केवढे तरी भले केले आहे! म्हणजे तुम्हीच हिशेब करा, की एक पुरवणी म्हणजे किती अधिक नोकऱ्या!! अशा नोकऱ्या नसतील, तर पत्रकारितेतल्या कच्च्या-बच्च्यांनी जायचे कुठे? लिहायचे कुठे? असो.
तर या दोन्ही पुरवण्यांचे "हॅपी बर्थ डे' नुकतेच (जून 2007) साजरे झाले. "टुडे' चा वर्धापनदिन सोहळा 15 जूनला झाला, तर "विवा'चा केक 25 जूनला लोकसत्ता आणि विवा परिवाराने खाल्ला. आम्हालाही त्यातला एक बाईट मिळाला म्हणा. खोटं कशाला बोला!
तर सांगायची गोष्ट अशी, की "टुडे'चा वर्धापनदिन अगदी झोकात साजरा झाला म्हणतात. हे म्हणजे अजि नवलच वर्तले म्हणायचे. कारण की जसा विदर्भ-मराठवाड्यातला शेतकरी म्हटले की तो आत्महत्याग्रस्त असतोच, तसा "सकाळ' म्हटले की तो परंपराग्रस्त असतोच असतो. (म्हणजे पुन्हा आत्महत्याग्रस्तच की!) तर असे असतानाही "सकाळ'ने चांगला (व्हाऊचर तब्बल चारशेचं होतं म्हणतात!) केक आणला, तो कापला आणि खाल्लासुद्धा. (त्यासोबत वाईन नव्हती, हे परूळेकरांवरील उपकारच म्हणायचे!) तर हा व्हाऊचर तब्बल चारशेचं असलेला केक कापण्यासाठी समीरा गुर्जर नावाची मराठी अभिनेत्री आणि नीलम शिर्के नावाची पुन्हा मराठी अभिनेत्रीच (अनुक्रमे परळ व ठाणे कार्यालयात) पाचारण करण्यात आली होती. हे अर्थात आम्हाला दुसऱ्या दिवशीच्या ठाणे टुडेमधूनच समजलं. (आम्ही तो वाचत नाही. आमच्या अभिरूचीबाबत गैरसमज नसावा म्हणून हा खुलासा.) पण ही पुरवणी पाहून एक प्रश्‍न पडलाच, की ठाण्यात प्रमुख पाहुणी कोण होती? नीलम शिर्के (मराठी अभिनेत्री) की स्वाती जोशी (ज्येष्ठ उपसंपादिका, सकाळ)? कारण की जिकडे पाहावे तिकडे फोटो तर या ज्येष्ठ भगिनीचेच दिसत होते. तर तेही असो.
एकूण सकाळमध्ये मटा संस्कृती हळूहळू रूजत चालली आहे याचेच हे चिन्ह आहे. अखेर संस्कृती ही प्रवाही असते - माणसांबरोबर तीही वाहत जाते - हेच खरे!!
"विवा' ("विवा'हिता हा शब्द नेमका कुठून आला हो?) या पुरवणीची तर बातच काही और. हिंदु कॉलनीतल्या संस्कृतच्या प्राध्यापकाच्या घरात एखादी "निर्मल सुंदर चंचल कोमल' अशी सुबक ठेंगणी अवखळपणा करीत फिरावी, अशी ही पुरवणी. इस्टमनकलर! तिचा लेआऊटच बघा ना नेहमी कसा कमनीयच! (अर्थात कधी कधी आर्टिकलं लावतात, की संस्कार भारतीच्या रांगोळ्या काढतात हेच कळत नाही, हा भाग वेगळा!)
तर "विवा'चा हॅप्पी बर्थडे ही चांगलाच उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसासही दस्तुरखुद्द सोनालीजी कुलकर्णी (मराठी अभिनेत्री) उपस्थित होत्या. (मराठी वृत्तपत्रं हल्ली व्हिज्युअल्सला किती महत्त्व देतात नाही!) तिथं आम्हीही होतो. लोकसत्तातल्या फोटोत शंकररावांच्या मागे दिसतो तो काळा ठिपका आमचाच. तर हा वर्धापनदिन सोहळाही चांगलाच झाला. सोनालीजी "विवा'च्या अतिथी संपादिका आहेत. (आता हे फक्त नावालाच बरं का. किंवा नवासाठी म्हणा. अन्यथा "विवा' कोणत्या तिथीला निघतो हेसुद्धा त्यांना ठावकी नसेल. असो.) तर त्या बोलल्या मात्र मस्त. आम्ही तर अगदी पाहातच राहिलो!
पण त्यांच्यापेक्षाही आम्हाला भावलं ते विवातल्या एका विवाईतेचे मनोगत. नेमकं तेच छापून नाही आलं लोकसत्तेत. तिकडं राजकारण खूप. त्याला कोण काय करणार?
पण आम्ही ठरवलं की ते भाषण आपल्या ब्लॉगवर द्यायचंच.
तर ती विवाईता म्हणाली...

""अध्यक्षमहाराज, उपस्थित गुरूजन वर्ग आणि जमलेल्या मित्रमैत्रिणींनो, (ही शाळेतली सवय. लवकर नाही सुटत.) ऍक्‍चुअली यू नो, मला मराठीत टॉक द्यायची हॅबिट नाहीये. बट आयल ट्राय. मी खरंतर आज खूप हॅपी आहे. कारण की यू नो आयम अ बिग फॅन ऑफ सोनालीदीदी. त्यांच्या सगळ्या फिल्म मी पाहिल्यात. म्हणजे दिल चाहता है. त्यांच्या गेस्ट एडिटरशिपखाली मी काम करते. सो आयम हॅप्पी. खरं तर मी व्हर्नाक्‍युलरमध्ये येणारच नव्हते. पण कुमारअंकल, चंदू अंकल, सुधीर अंकल हे सगळे माझ्या डॅडचे फ्रेंड्‌स आहेत. तेव्हा डॅड म्हणाले, व्हाय डोंच्यू यू ट्राय इन लोकसट्टा. पॉकेटमनी तरी सुटेल. सो आय ऍग्रीड. शिवाय यू नो आयम व्हेरी सोशली कॉन्शस पर्सन. मग आय बिकेम पार्ट ऑफ विवा फॅमिली.''

येथून ती विवाईता सुटली, ते थेट तिच्या पहिल्या स्टोरीवर आली. ते फारच उद्‌बोधक होते. ती म्हणाली -
"ऍण्ड दॅट डे केम... समबडी टोल्ड मी की आय हॅव टू फाईल अ स्टोरी. म्हणाले, की मजकूर कमी पडतोय. मग मी खूप विचार केला. मग मी कुमारअंकलकडे गेले. ते म्हणाले, पाकिस्तानात सध्या हे चाललंय. क्‍युबात ते चाललंय. डायलेक्‍टिक मटेरियालिझम समजून घे आणि ज्वालामुखीच्या तोंडावर वाच. मला काही ते कळलं नाही, पण कुमारअंकल इज सो ग्रेट. मग मी चंदूअंकलकडे गेले. ते म्हणाले, चॉकलेट खाणार? आणि गुलाम अलीची नवी सीडी ऐकलीस का? आणि मग त्यांनी मला विद्यापीठातलं राजकारण सांगितलं. ही इज सो कूल ना. मग मी सुधीरअंकलकडे गेले, तेव्हा ते म्हणाले नमस्ते सदा वत्सले. मग मीही नमस्ते म्हणाले. मग त्यांनी मला सांगितले, की सोशली रिस्पॉन्सिबल स्टोरी कर. तेव्हा मग मी पुन्हा खूप विचार केला. तेवढ्यात रेश्‍मा टोल्ड मी, की पेपे जीन्सचं नवं कलेक्‍शन आलंय. तू पाहिलंस का? ऍण्ड इट वॉज लाईक लाईटनिंग स्ट्रक मी. आणि मग मी माझी आयुष्यातली पहिली स्टोरी विथ बायलाईन दिली - पेपे जीन्स बाजारात! इट वॉज ए व्हेरी सोशली रिस्पॉन्सिबल स्टोरी. एव्हरीबडी ऍप्रिसिएटेड इट.
आता माझी एकच अँबिशन आहे. मला की नाही सोनालीदीदीसारखी मोठी गेस्ट एडिटर बनायचंय. थॅंक्‍यू.

हे भाषण ऐकून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं म्हणतात. त्यावेळी बाहेरही आकाश गळत होतं. रामनाथजी गोयंका वर गदगदले असावेत.

Thursday, May 29, 2008

नाका कामगार

विक्रोळी, कांजूरचा पॉश विभाग सोडला की अचानक एक कळकटलेला, जुनापुराणा भाग तुम्हांला दिसू लागतो. रस्त्यावर रिक्षांची, मोडक्‍या बेस्ट बसेसची गर्दी, पदपथांवर बसलेले फेरीवाले, त्यांच्या मराठी आरोळ्या, डोंगरांवरील चाळी, मधूनच दिसणाऱ्या उंच इमारती आणि काही कारखान्यांचे भग्न अवशेष असे वातावरण एकदम तुमच्या अंगावर येते. हे भांडुप. मुंबईचे शांघाय झाल्यानंतरही तिच्या पोटात अशी काही न पचलेल्या अन्नासारखी बेटं उरलीच. त्यातलेच हे एक. मुंबईचे एक उपनगर.
इकडे कांजूर, पुढे मुलुंडचा स्पेशल झोन यांमध्ये एलबीएस एक्‍स्प्रेस हायवेच्या एका बाजूला भांडुपचा पसारा मांडलेला आहे. या हायवेवरून मुलुंडच्या दिशेने थोडे पुढे गेले की भांडुप नाका लागतो. पूर्वी येथे प्लंबर, कार्पेंटर, रंगारी, कुली असे लोक बसत असत. (अधिक संदर्भासाठी पाहा ः मी पाहिलेले भांडुप - डॉ. अनुजा लेले, ऑक्‍सफर्ड युनि. प्रेस, किं. अ3000). त्यांना "नाका कामगार' असे म्हणत. निळू दामले सांगत होते, की मध्यंतरी आलेल्या आत्महत्येच्या साथीत त्यातील अनेक लोक नामशेष झाले. परंतु गेल्या काही वर्षात तेथे नव्याने नाका कामगार दिसू लागले आहेत.
निळू म्हणजे वेगळेच रसायन आहे. हा माणूस सारखा फिरत असतो. परवाच तो आठवी गल्ली, जुहू येथे जाऊन आला. आता त्याचे त्यावरच्या पुस्तकाचे लेखन सुरू आहे. तर मराठीतील काही पत्रकार व लेखक, त्यांना तिकिटाचे पैसे कोण देते, यावर संशोधनात्मक प्रबंध लिहित आहेत.
एका पदपथाकडे बोट करून दामले म्हणाले, ते तिथं उकीडवे बसलेले लोक आहेत ना ते हल्लीचे नाका कामगार.
तिथे अनेक लोक घोळक्‍याने बसलेले होते. काही जण गटागटाने टपरीवरचा कटिंग चहा पीत उभे होते. जवळ जाऊन पाहिलं, तर काहींच्या हातात जुने, कळकटलेले लॅपटॉप होते. काहींच्या गळ्यात कॅमेरे, हॅंडिकॅम लटकावलेले होते. झाडाखाली चारपाच जण एकच सिगारेट फुंकत उभे होते. त्यांच्या खिशाला डिजिटल साऊंड रेकॉर्डर लटकावलेले दिसत होते.
निळू सांगत होते, या कामगारांमध्येही अलीकडे श्रेणीरचना आलेली आहे. त्यातल्या त्यात जे श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे मल्टिमिडियाची सगळी हत्यारे असतात. बाकीचे ती पुण्याहून भाड्याने आणतात. तिथं बुधवारात त्याचे मोठे दुकान आहे.
विचारलं, पण यांना कामाला नेतं कोण?
निळू म्हणाले, आता साडे नऊ वाजत आलेत. लवकरच तुला ते कळेल.
ही निळूची नेहमीची सवय. कोणतीही माहिती तो मौखिक पद्धतीने हल्ली देतच नाही. त्यावर लगेच पुस्तक लिहून टाकतो.
थोड्या वेळाने एलबीएस हायवेवरून एक मोठी कार येऊन तिथं थांबली. तिच्यामागे एक टेम्पो होता. कारमधून एक पांढरा मनिला इनशर्ट, पाचसाडेपाच फूट उंचीचा, भांग डावीकडे व्यवस्थित पाडलेला तरूण उतरला. निळू म्हणाले, हा विकास. केतकरांचा वैयक्तिक सहायक. केतकर म्हणजे कुमार केतकर. लोकसत्ताचे एनआरआय एडिटर.
विकासला पाहताच नाका कामगारांमध्ये एकच खळबळ माजली. सगळे त्याच्याभोवती गोळा झाले. निळू म्हणाले, सगळे आले, पण बघ, ते मल्टिमिडियावाले मात्र जागचे हललेही नाहीत.
विचारलं, असं का? तर निळू गालात हसले. म्हणाले, लोकसत्ता अजूनही साठीच्या साक्षीदारांसाठीच काढतात!
विकासभोवती आता चांगलीच गर्दी झाली होती. पण तो नेहमीच्या सवयीने शांत होता. आजूबाजूला नजर फिरवित तो म्हणाला, पुढच्या चार महिन्यांच्या पुरवण्या छापून तयार आहेत. तेव्हा आज फक्त मुख्य अंकाचंच काम आहे. एक चीफसब आणि दोन उपसंपादकच लागतील.
त्याबरोबर तिथं एकच रेटारेटी सुरू झाली. एक जण ओरडून म्हणत होता, मला घ्या. मला घ्या. पंधरा वर्षांचा अनुभव आहे पहिल्या पानाचा. दीडशेत येतो.
दुसरा म्हणत होता, मी गार्सियावाला आहे हो. नऊ वर्ष काढलीत पहिल्या पानावर. सव्वाशेतसुद्धा येईन.
असं बराच काळ चालल्यावर विकासने तिघा जणांना शंभरात पटवं. चा वाजता लालबागला या, असं सांगून तो कारमधून भुर्रकन्‌ गेला.
ेत्याची कार एलबीएसवरून टर्न घेतच होती, तोवर लोकमत, मटा, सकाळ अशा विविध कालिकांच्या गाड्या तेथे येऊन उभ्या ठाकल्या होत्या.
निळू म्हणाला, अरे व्वा. आज मटातून प्रत्यक्ष भारतकुमार आलेत. चल भेटू या त्यांना. भारतकुमार म्हणजे गणपतीवाले. कारची काच खाली करून ते बाहेरच्या लोकांचा अंदाज घेत बसले होते. निळूने त्यांना नमस्कार केला. आमची ओळख करून दिली. त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले.
निळूच म्हणाले, काय आज स्वतः आलात?
ते म्हणाले, हो. इकडे मुलुंडला शाखेत निघालो होतो. म्हटलं जाता जाता दोन-चार माणसं पाठवून देऊ.
विचारले, तुम्हांला कशाप्रकारची माणसं लागतात?
ते तुटकपणे म्हणाले, त्याचं काही नक्की नसतं. काम असेल तशी माणसं नेतो.
विचारले, मग आज कोणतं काम काढलं आहे?
ते म्हणाले, मुंटा लावायचाय. अंकासाठी मालिकेची पुढची प्रकरणंही लिहायचीत. त्यामुळे डीटीपी आलं तरी पुरे.
असं म्हणून त्यांनी आमच्याकडे पुन्हा दुर्लक्ष केले. मग आम्ही लोकमतचे दिनकरबाबू उभे होते, तिकडे गेलो. निळू म्हणाले, त्यांना फक्त मराठवाड्याची आणि पेजिनेशन येणारीच माणसं लागतात.
त्यांच्या आड काही जण गळ घेऊन उभे होते. मी विचारलं, ते लोक कोण?
निळू हसत म्हणाले, ते मुंबई सकाळवाले. कोणी एखादा माणूस नापसंत केला, की ते लगेच त्याच्यावर गळ टाकतात. नेहमीचंच आहे ते.
तोवर साडेदहा वाजत आले होते. सगळ्या गाड्या निघून गेल्या होत्या. काम न मिळालेले पत्रकार तिथेच पडक्‍या चेहऱ्याने रेंगाळत होते. वार्ताहर, पुण्यनगरी, नवाकाळच्या गाड्या अजून यायच्या होत्या. तिथं तरी काम मिळेल या आशेने ते उभे होते. अनेकांनी तिथंच बसून बातम्या, लेख लिहायला सुरूवात केली होती. निळू म्हणाले, हे आता दिवसभर फ्री लान्सिंग करणार. युनिक-बिनिकवाले घेतात कधीमधी त्यांच्याकडून असा माल. पण त्यांचं खरं गिऱ्हाईक म्हणजे साप्ताहिक सकाळ, लोकप्रभा, चित्रलेखा अशी साप्ताहिकंच.
पण यातूनही ज्यांना काहीच काम मिळत नाही, ते काय करतात?
निळू म्हणाले, अरे त्यातले अनेक जण लग्नपत्रिका वगैरे डिझाईन करून देण्याचं काम करतात. तो कवी पाहिलास? संडे सप्लिमेंटचा संपादक होता. काय रूबाब होता त्याचा तेव्हा. आता शाखाप्रमुखांची भाषणं लिहून देतो.
म्हणालो, त्यातल्या काही जणांशी बोलता येईल का?
निळू उत्साहाने मला त्यातल्या एकाकडे घेऊन गेले. म्हणाले, हे अमुक तमूक. सगळे पेपर फिरून आलेत. काय हवं ते विचार त्यांना.
विचारले, तुम्ही केव्हापासून येता नाक्‍यावर?
तो हातातला लॅपटॉप सुरू करायला लागला. तेवढ्यात निळू घाईघाईने म्हणाले, ते नको. ते नको. तसंच सांगा.
म्हणालो, काय झालं? निळू म्हणाले, ती त्यांची जुनी सवय. पूर्वी सकाळमध्ये होते. त्यामुळे काहीही सांगायचं झालं, तरी पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन करतात.
अमुक तमूक कसनुसे हसले. मग सर्व काही पाठ असल्याप्रमाणे सांगू लागले, आमची केतकर-टिकेकर-कुवळेकरांची पत्रकारीता. पण आता त्यातलं काही राहिलं नाही. मी थोडं थोडं समजून घ्यायचा प्रयत्न केला. हे पीपी प्रेझेन्टेशन वगैरे. पण आपल्याला काही ते मानवलं नाही. बरीच वर्ष कॉन्ट्रॅक्‍टवर काढली. पण ते संपलं की कोणी रिन्यूच करीना. म्हणायचे पीएमएसमध्ये बसत नाहीत तुम्ही. पुढे पुढे सगळ्यांचंच असं होत गेलं. मग सगळ्यांबरोबर मीही नाक्‍यावर आलो.
सगळे म्हणजे?
सगळे. गार्सियावाले. मल्टिमिडियावाले. वेबवाले. पेजिनेशनवाले.
पण यात पत्रकार कुठे आहेत? आम्ही आश्‍चर्याने विचारले.
तर तो म्हणाला, पत्रकार? म्हणजे तुम्हाला माहित नाही? ते तर ब्रॉडशिटबरोबरच संपले!