Friday, April 4, 2008

काढीन मीही एक वाहिनी...

मुंबईच्या वातावरणात सध्या एन्फ्लुएंझाचे विषाणू आणि नव्या वाहिन्यांची चर्चा एवढेच दिसते आहे. प्रत्येकाच्या तोंडात एकच ः स्टार माझा पाहिलास? कसा वाटला? आयबीएनचे मराठी चॅनेल कधी येणार? निखिल आणि लोकमतचे पटणार का? मिलिंद कोकजेंचे असे काय झाले की त्यांनी पत्रकारिताच सोडली? संजीवकुमार लाटकर यांनी मल्टिराजीनामा दिला का? ते कोणत्या चॅनेलमध्ये जाणार? मग सकाळच्या चॅनेलचे काय होणार?

आमच्या बहिर्जी नाईक्‍सनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षाखेरीस निखिल-लोकमत वाहिनी नक्की येतेय. आणि सकाळच्या चॅनेलचे काम कृष्णा खोरे पाटबंधारे कामांप्रमाणेच(!) जोरात सुरू आहे. अलीकडेच सकाळचे 60-70 जण म्हणे खास प्रशिक्षणासाठी हैदराबादेस गेले होते. तर एकूण सर्वांचे ठीकच चालले आहे.

वास्तविक चॅनेल काढणे हे काही फार अवघड काम नाही. काय लागतं काय त्याच्यासाठी? दीडदोनशे कोटी रूपये (आपल्याला काय नाय वाटत एवढ्या पैशांचं!), एखाददोन स्टुडिओ, बालवाडीतली मुले-मुली आणि दोनेक संपादक, सीईओ वगैरे मंडळी. ती काय हल्ली... मिळतात! (काय गंमत आहे ना! संपादक पायलीला पन्नास मिळतात आणि चांगले उपसंपादक मात्र द्याहीदिसा कंदिल घेऊन गेले तरी सापडत नाहीत! हवं तर लोकमतला विचारा. बिचाऱ्या संपादकांना तिथे पाने लावावी लागतात.)

तर नमनालाच एवढे घडाभर तेल लावल्यानंतर मूळ मुद्द्यावर येतो.
मुद्दा असा, की चॅनेल काय कोणीही काढू शकतो. दस्तुरखुद्द विसोबासुद्धा.
तुम्हांस सांगतो...

मनात आणीन तर बच्चमजी
काढीन मीही एक वाहिनी
दिपतील डोळे, इतरांसाठी
असेल ती विद्युतदाहिनी

सकाळसकाळी रोज प्रसारिन
बैठकीची ढिंगटांग लावणी
संपादकांची सुबक मेव्हणी
कुकरी शोची खास पाहुणी

राऊत करतील शो अध्यात्मिक
जिथे केतकर असतील अँकर
तारतम्यला लावून चाली
गाणी गातील स्वतः टिकेकर

देतील जेथे क्राईम स्टोऱ्या
दाऊद आणि राजन भाई
कोण खुलासे करील त्यांचे
कोणा गा मरणाची घाई?

...पण आम्ही आमच्या सगळ्याच योजना आताच का खुल्या करू? उद्या वेळेवर चॅनेल नाहीच आला, तर तुम्ही लगेच म्हणायला मोकळे, की विसोबा, सकाळच्या, सॉरी सॉरी... तुमच्या चॅनेलचे झाले काय?
हे म्हणजे मारूती कांबळेचे झाले काय असे झाले!
अखेरपर्यंत कोडेच!!

1 comment: