Friday, March 28, 2008

कसलं काय अन्‌ फाटक्‍यात पाय!

ना घरात, ना घराबाहेर, ना व्यासपीठावरून, ना व्यासपीठाखालून अशा पद्धतीने मावळते राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी तमाम प्रसारमाध्यमांच्या बुडाखाली एका अग्निपंखी सवालाचे मिसाईल डागले आणि मराठी पत्रसृष्टी विचारमग्न झाली.
भारतातील एक अब्ज लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमे स्वीकारतील का? या कलामांच्या सवालाने सर्वांनाच तिढा घातला होता. जबाबदारी मोठी होती. आव्हान मोठे होते. प्रश्‍न जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे त्याचा होता!

केतकरांनी (पक्षी : कुमार केतकर, एनआरआय एडिटर, लोकसत्ता) ठरविले, की यावर किमान एक अग्रलेख तर लिहिलाच पाहिजे. (रामनाथ गोएंका पुरस्कार सोहळ्यातच व्यासपीठावर अर्धवट बसून कलामांनी हा खडा सवाल टाकला होता. म्हणजे हे एकतर घरचेच कार्य होते. आणि दुसरे म्हणजे दंतशस्त्रक्रिया झाल्यानंतर बऱ्याच दिवसांत कुणाचाही बाईट न घेतल्याने त्यांचीही जरा गोचीच झाली होती!) तेव्हा त्य?ंनी फटाककन्‌ आपल्या टपोऱ्या अक्षरांत एक अग्रलेख लिहून काढला. (केतकरसाहेब, निवृत्तीनंतर लोकसत्ताच्या परंपरेनुसार तुम्ही कसे हो सकाळमध्ये जाणार? तुम्हांला तर संगणकावर लिहिताही येत नाही!) अग्रलेख तर लिहिला, पण पुढे काय? त्याचा लॉजिकल एंड काय? ते डावीकडून विचारात पडले...

इकडे डॉक्‍टर टिकेकरही आपल्या "स्टडी-फ्लॅट'मध्ये अस्वस्थपणे येरझाऱ्या घालीत होते. आपलीच "जन-मन', "तारतम्या'दी ग्रंथसंपदा पुनःपुन्हा वाचूनही त्यांना काय करावे हे सुचत नव्हते. चिंतन करकरून त्यांना श्‍वास घुसमटल्यासारखे वाटू लागले. जरा वेळाने त्यांच्या लक्षात आले, की आपल्या सदनिकेत एवढा धूर साचला आहे की आत ऑक्‍सिजन येण्यासही जागा नाही. तेव्हा त्यांनी खिडकी उघडून दुसरी सिगारेट शिलगावली. कलामांच्या सवालावर एखादे पुस्तक लिहावे काय? "श्रीविद्या'शी बोलले पाहिजे, असा उदात्त मध्यममार्गी अनुनासिक विचार त्यांच्या मनात तरळून गेला...

राऊत गणपतीवाले यांची अडचण वेगळीच होती. हे एक अब्ज लोक म्हणजे नेमके कोण? ते कोठे राहतात? पार्ल्यात, गिरगावात, डोंबोलीत की बदलापुरात? हे लोक विकेंडला कोठे जातात? त्यांचे अध्यात्म काय आहे? ते शिवसेनेत असतात की मनसेमध्ये? राज्यसभेवर जाण्यासाठी या एक अब्ज लोकांची मते आवश्‍यक असतात काय? त्यांच्या लक्षात काहीच येत नव्हते. त्यांनी मग उजवीकडून डाव्या दृष्टिकोनातून विचार सुरू केला, की बघू या टैम्सॉफ इंडिया काय करतेय ते. मग आपण आपले धोरण ठरवू...

त्याचवेळी संजीवकुमार लाटकर अतिशय काळजीपूर्वक टीव्ही चॅनेल्स पाहात होते. त्याचवेळी त्यांचे लॅपटॉपवर नेटसर्फिंग सुरू होते. त्याचवेळी त्यांच्या डोक्‍यात नव्या कथेचा आराखडा घुमत होता. त्याचवेळी ते नाश्‍ताही करीत होते. मोबाईलवर बोलणे तर अखंड सुरूच होते. असे सर्व मल्टिकाम सुरू असतानाच त्यांचे कलामांचे करायचे काय या प्रश्‍नावरील चिंतनही सुरू होते. याविषयावर एफएमवर एखादे चर्चासत्र करावे? की चॅनेलवर डॉक्‍युमेंट्री? त्यांचे नक्की काही ठरत नव्हते...

हे सर्व सुरू असताना सकाळमध्ये सर्व संपादकांची व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू झाली होती. त्यात आधी आनंदराव आगाशे यांचा जागराचा कार्यक्रम झाला. मग साबडे, मग खोले, मग पाध्ये, मग मालकर असे सर्व मनसबदार बोलले. त्यावर राज्यातील सर्व आवृत्त्यांच्या सरदारांनी माना डोलावण्याचा कार्यक्रम झाला. (त्यांना वाटले हे सर्व आपल्याच चॅनेलबद्दल चालले आहे!) मग पुण्यातून कॉन्फरन्स संपविण्यात आली. तर या सर्व उपक्रमात असे ठरले, की श्री. कलाम यांच्या आवाहनावर विचार करण्याकरीता लवकरच पुण्यात ना उजवीकडे ना डावीकडे अशी बैठक घेण्यात यावी...

लोकमतमध्ये मात्र अद्याप सामसूमच होती. दिनकरबाबूजी औरंगाबादला गेले होते. आजही बारा पानांचा हा गोवर्धन आपणांस एकट्यानेच उचलायचा आहे, या विचाराने गिरधारी थकले होते. भारतात एक अब्ज लोक आहेत. त्यात दोन-चार चांगले उपसंपादकही असू नयेत व ते आपणांस मिळू नयेत, या विचाराने ते कालच्याप्रमाणेच आजही चिडचिडले होते...

येणेप्रकारे कलामांच्या सवालाने सर्वांनाच विचारात पाडले होते.
आणि मग दुसरा दिवस उजाडला....
धडधडत्या काळजाने आम्ही वाचनालयात गेलो.
एकेक पेपर चाळू लागलो.
म्हटलं, या लोकांनी काल कलामांना फारच मनावर घेतलं. आज काही उत्तम, उदात्त आणि उन्नत घोळ नाही ना घातला!
पण पेपर चाळले आणि सर्व शंका ढगात गेल्या!
राजकारण्यांचे कलगीतुरे
सर्वक्षेत्रीय घोटाळे
नोकिया आणि कंडोमच्या जाहिराती
मालिका आणि गणपती
सेन्सेक्‍स आणि बॉबी डार्लिंग
सारे काही जागच्या जागी होते.

क्त राष्ट्रपती तेवढे बदलले होते.
तेव्हा आम्ही एक अब्ज लोकांच्या वतीने कलामांना म्हटले, चाचा, कसलं काय आणि फाटक्‍यात पाय!

No comments: