हम आह भी भरते हैं
तो हो जाते है बदनाम
वो कविताभी करते हैं
तो चर्चा नही होता...
आम्हांस एक कविता काय झाली अन् जणू काही सकाळमध्ये एक्स्क्स्युजिव्ह बातमी प्रसिद्ध झाली असा गदारोळ झाला! (आता कविता म्हणजे काय व झाली म्हणजे काय असे तुम्ही विचाराल. तर कविता म्हणजे एरवी सरळ लिहावयाच्या ओळी मध्येच कुठेही तोडून एका खाली एक लिहिल्या की जे होते त्यास कविता म्हणतात! आय ऍम राईट ना, संजीवजी खांडेकर?) पण यात आमची काडीमात्र चूक नाही! पत्रकार म्हटला की त्याला काही दोष-दुर्गुण आपोआपच चिकटतात. एक म्हणजे तो स्वतःला विकिपेडिया समजू लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाने भरण्यासाठी "लळीत' वगैरे लिहिता लिहिता कविता पाडू लागतो. (आता कविता पाडणे म्हणजे काय असे तुम्ही विचाराल, तर काही काहींना म्हणे असे असते, की आधी पाऊस पडतो आणि मग जंत पडावा तशा कविता पडतात! त्याला 'पाऊसवेणा' म्हणतात!)
पत्रसृष्टीला ही कविताकारांची लागण फार पूर्वीपासूनची आहे. पण पूर्वी एक बरे असायचे, की तेव्हाचे कविताकार थोर थोर तरी असायचे. उदाहरणार्थ एकेकाळी सकाळमध्ये कुसुमाग्रज (पक्षी : वि. वा. शिरवाडकर) होते. (पण तेही नाही टिकले! आता ते टिकले नाही, म्हणजे काय असे तुम्ही विचाराल, तर त्याचाही एक थोर किस्सा आहे. थोर संपादक नानासाहेब परूळेकर यांनी शिरवाडकरांना सांगितले होते, की "तुम्हाला सरळ लिहिता येते हे एकच तुमचे क्वालिफिकेशन मानतो!' तर बहुधा शिरवाडकरांना सरळ लिहिता न आल्याने त्यांनी सकाळ सोडला असावा! असो.)
तर बहुधा या प्रसंगाचा धडा घेऊन तमाम कविताकार जे भूमिगत झाले ते झालेच! (आता भूमिगत झाले म्हणजे काय, असे तुम्ही विचाराल तर हे कविताकार हल्ली फक्त छायाचित्र ओळी यांसारख्या माध्यमातूनच प्रकट होतात व एरवी एखाद्या पानगृहात बसून बेसावध सहकाऱ्यांना पीळ मारतात!) तर अशा या भूमिगत कविताकारांचा शोध घेण्याची एक दंशमोहिम (पक्षी ः स्टिंग ऑपरेशन) आम्ही आमच्या बहिर्जी नाईक्सच्या साह्याने नुकतीच पार पाडली. आणि अहो आश्चर्यम्! ज्यांचा कुणाला संशयही येणार नाही, असे बोरूबहाद्दरही कविता रचत असल्याचे आम्हांस आढळून की हो आले!!
पेश करीत आहोत त्यातील काही निवडक कविता -
तर आमच्या पहिल्या कविताकाराचे नाव आहे चंदुअंकल कुलकर्णी! ठाण्यातील लोकसत्ताच्या कार्यालयात ते एकदा गेले असता त्यांना सदरहू कविता स्फुरली असा प्रवाद आहे. ते लिहितात :
""मी येतोऽऽऽ आणिक जातोऽऽऽ
येताना कधी चॉकलेट आणितो...
आणि जाताना टिफिन मोकळा नेतोऽऽऽ...
येतोऽऽऽ आणिक जातोऽऽऽ''
"जय महाराष्ट्र'कार साथी प्रकाश अकोलकरांचे काव्य त्यांच्या प्रकृतीला साजेल असेच शायरीबाजाचे असते. त्यांच्या पेन ड्राईव्हमध्ये अनेक कविता असल्याची चर्चा प्रेस क्लबमध्ये आहे. परवा म्हणे त्यांनी प्रेस क्लबमध्ये ही कविता सादर केल. सुदैवाने तेव्हा त्यांच्याकडे अन्य कोणाचे नसले, तरी आमच्या बहिर्जी नाईक्सचे लक्ष होते. ते गात होते. -
"जै जै महाराष्ट्र घ्या ना, जै जै महाराष्ट्र घ्या ना...
पुस्तक आमुचे किती मोलाचे, शिवसेनेच्या इतिहासाचे
कन्सेशन त्यां कसले मागता विकत घेऊनी वाचा ना...''
(वास्तविक साथी प्रकाशभाईंनी आपले हे पुस्तक अनेकांना तसेच दिले असल्याचीही आमची माहिती आहे. पण लोकांना कदर आहे का कशाची?)
आमचे पुढचे कविताकार आहेत समस्त कास्तकारांचे तारणहार क्रांतिवीर निशिकांतजी भालेराव! कवितेचे नाव आहे ः "जट्रोफाचा मळा'
"जट्रोफाच्या मळ्यात कोण गं उभी
ऍग्रोवन वाचिते मी रावजी
रावजी, पेपर काढण्यापरी वो आमची शेती बरी...
द्राक्षाची गं तु चांदणी
भरला बांधा केळीवाणी
मंजुळा, इव्हेंट करू एखांदा गं तुझ्या बांधावरी!''
(सकाळने भरविलेल्या वाईन फेस्टिव्हलमध्ये त्यांना हे काव्य सुचले असे सांगणारे सांगतात! त्यांच्या "ग्रीनहौस पुरवा महाराज, मला आणा इस्त्रायली साज...' या कवितेला यंदाचा जैन ठिबक सिंचन पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आमचे बहिर्जी नाईक्स कळवितात.)
कविता आणि प्रेमभावना यांचा अन्योन्य (जैसा पत्रकार आणि पाकिट!) संबंध आहे. पण बोरूबहाद्दरांचा मात्र या भावनेवर फारसा विश्वास दिसत नाही. (त्यांचे लफड्यावर अधिक प्रेम!) परवा तर सकाळच्या एका लहानखुऱ्या महिला पत्रकाराने मुंबईतल्या कुठल्याशा किल्ल्यावर प्रेमकूजन करीत बसलेल्या जोडप्यांना चांगलेच घाबरवून सोडले! (म्हणून आम्ही मुलींना सांगतो, की मुंबई सकाळमध्ये जाऊ नका. अकाली म्हाताऱ्या व्हाल!!) असो. तर असे असले, तरी आमच्या बहिर्जी नाईक्सच्या म्हणण्यानुसार अनेक पत्रकार लपूनछपून प्रीतीकाव्यही लिहित आहेत. त्यातलीच ही एक विदग्ध कविता. शीर्षक आहे - "क्राईम रिपोर्टरची कविता'
तुझं खळबळजनक चालणं
तुझं सनसनाटी पाहणं
तुझ्या सुसाट स्मितानं
धाडकन् कोसळतं चांदणं
ही चकमक चकमक नजर
हे एन्काऊंटरी कटाक्ष
किती हृदयांचं हत्यकां
तू केलं सर्वांसमक्ष
इश्काच्या टोळीयुद्धात
तू असशील महामाहीर
नाही ऐरागैरा
प्रणयाचा खंडणीखोर!
नक्कीच भारतीय दंडविधानाच्या कुठल्याशा कलमाखाली ही कविता लिहिण्यात आली असणार. तिचे कवी आहेत लोकमतचे श्यामसुंदर सोन्नार. किती पोएटिक नाव! जणू फडक्यांच्या कादंबरीचा नायक. पण हा माणूस क्राईम करतो! नावात काय आहे म्हणतात तेच खरे! काही काही नावं अशीच फसवी असतात.
आमच्या प्रशांत दीक्षितांचे मात्र तसे नाही. नावाप्रमाणेच ते हल्ली अगदी प्र-शांत असतात. सध्या ते कोटातल्या कचेरीत एकांतवास अनुभवत आहेत. मात्र त्यामुळे त्यांच्या काव्यप्रतिभेला कसा सर्वोदयी बहर आला आहे. अलीकडेच "टेलिग्राफ' वाचता वाचता ते विनोबांच्या साहित्याचेही परिशिलन करीत असतात. त्यांची ही कविता काहीशी "संथ वाहते कृष्णामाई'च्या चालीवर जाते. -
""संथ वाचतो मी गीताई
अंकामधल्या कशाकशाशी मजला घेणे नाही...''
अशा उदंड कविता आहेत. पण यातील आम्हांस भावली ती कविता काही वेगळीच आहे. दुर्दैवाने तिचे कविताकार कोण आहेत व ती कोणत्या संदर्भात लिहिली याचा पत्ता आमच्या बहिर्जी नाईक्सनाही लागू शकलेला नाही.
या अत्यंत चिंतनगर्भ कवितेचे नाव आहे "अभिनंदनाचे अभंग.' (तुकोबांच्या गाथेत जसे सालोमालोचे अभंग तसेच हे अभिनंदनाचे अभंग दिसतात. संशोधन व्हायला हवे!) तर ती कविता अशी आहे. -
घालीन लोटांगण वंदिन चरणम्
डोळ्याने पाहिन रुप तुझे
प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन
भावे ओवाळीन म्हणे थोरा!
तथास्तु!!
Sunday, June 1, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
ज्वारी,बाजरी वगैरे धान्यापासून दारू निर्मितीचे परवाने वाटून झाल्यावर बारामतीला म्हणे एका कार्यक्रमात झेंडावंदन खंब्यासमोर ( खंबा म्हणजे..) झाले व गायत्री मंत्र असा म्हटला गेला:
गुरुर रम्मा,गुरुर व्हिस्की, गुरुर व्होडका--जिनेश्वरा !
गुरुर स्कॉचा, परम ब्रॅंडी, तस्मै श्री बियरे नम:
ओsम श्री अल्कोहलाय नम:
Post a Comment