Friday, May 30, 2008

हॅपी बर्थ डेची गोष्ट

वृत्तपत्रसृष्टीच्या गौरवशाली इतिहासात जून महिन्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण की याच मासोत्तमात "लोकसत्ता'च्या कमनीय आणि सप्तरंगी "विवा'चा, तसेच "सकाळ'च्या सचित्र आणि रंगीत "टुडे'चा जन्म झाला. या दोन पुरवण्यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे केवढे तरी भले केले आहे! म्हणजे तुम्हीच हिशेब करा, की एक पुरवणी म्हणजे किती अधिक नोकऱ्या!! अशा नोकऱ्या नसतील, तर पत्रकारितेतल्या कच्च्या-बच्च्यांनी जायचे कुठे? लिहायचे कुठे? असो.
तर या दोन्ही पुरवण्यांचे "हॅपी बर्थ डे' नुकतेच (जून 2007) साजरे झाले. "टुडे' चा वर्धापनदिन सोहळा 15 जूनला झाला, तर "विवा'चा केक 25 जूनला लोकसत्ता आणि विवा परिवाराने खाल्ला. आम्हालाही त्यातला एक बाईट मिळाला म्हणा. खोटं कशाला बोला!
तर सांगायची गोष्ट अशी, की "टुडे'चा वर्धापनदिन अगदी झोकात साजरा झाला म्हणतात. हे म्हणजे अजि नवलच वर्तले म्हणायचे. कारण की जसा विदर्भ-मराठवाड्यातला शेतकरी म्हटले की तो आत्महत्याग्रस्त असतोच, तसा "सकाळ' म्हटले की तो परंपराग्रस्त असतोच असतो. (म्हणजे पुन्हा आत्महत्याग्रस्तच की!) तर असे असतानाही "सकाळ'ने चांगला (व्हाऊचर तब्बल चारशेचं होतं म्हणतात!) केक आणला, तो कापला आणि खाल्लासुद्धा. (त्यासोबत वाईन नव्हती, हे परूळेकरांवरील उपकारच म्हणायचे!) तर हा व्हाऊचर तब्बल चारशेचं असलेला केक कापण्यासाठी समीरा गुर्जर नावाची मराठी अभिनेत्री आणि नीलम शिर्के नावाची पुन्हा मराठी अभिनेत्रीच (अनुक्रमे परळ व ठाणे कार्यालयात) पाचारण करण्यात आली होती. हे अर्थात आम्हाला दुसऱ्या दिवशीच्या ठाणे टुडेमधूनच समजलं. (आम्ही तो वाचत नाही. आमच्या अभिरूचीबाबत गैरसमज नसावा म्हणून हा खुलासा.) पण ही पुरवणी पाहून एक प्रश्‍न पडलाच, की ठाण्यात प्रमुख पाहुणी कोण होती? नीलम शिर्के (मराठी अभिनेत्री) की स्वाती जोशी (ज्येष्ठ उपसंपादिका, सकाळ)? कारण की जिकडे पाहावे तिकडे फोटो तर या ज्येष्ठ भगिनीचेच दिसत होते. तर तेही असो.
एकूण सकाळमध्ये मटा संस्कृती हळूहळू रूजत चालली आहे याचेच हे चिन्ह आहे. अखेर संस्कृती ही प्रवाही असते - माणसांबरोबर तीही वाहत जाते - हेच खरे!!
"विवा' ("विवा'हिता हा शब्द नेमका कुठून आला हो?) या पुरवणीची तर बातच काही और. हिंदु कॉलनीतल्या संस्कृतच्या प्राध्यापकाच्या घरात एखादी "निर्मल सुंदर चंचल कोमल' अशी सुबक ठेंगणी अवखळपणा करीत फिरावी, अशी ही पुरवणी. इस्टमनकलर! तिचा लेआऊटच बघा ना नेहमी कसा कमनीयच! (अर्थात कधी कधी आर्टिकलं लावतात, की संस्कार भारतीच्या रांगोळ्या काढतात हेच कळत नाही, हा भाग वेगळा!)
तर "विवा'चा हॅप्पी बर्थडे ही चांगलाच उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसासही दस्तुरखुद्द सोनालीजी कुलकर्णी (मराठी अभिनेत्री) उपस्थित होत्या. (मराठी वृत्तपत्रं हल्ली व्हिज्युअल्सला किती महत्त्व देतात नाही!) तिथं आम्हीही होतो. लोकसत्तातल्या फोटोत शंकररावांच्या मागे दिसतो तो काळा ठिपका आमचाच. तर हा वर्धापनदिन सोहळाही चांगलाच झाला. सोनालीजी "विवा'च्या अतिथी संपादिका आहेत. (आता हे फक्त नावालाच बरं का. किंवा नवासाठी म्हणा. अन्यथा "विवा' कोणत्या तिथीला निघतो हेसुद्धा त्यांना ठावकी नसेल. असो.) तर त्या बोलल्या मात्र मस्त. आम्ही तर अगदी पाहातच राहिलो!
पण त्यांच्यापेक्षाही आम्हाला भावलं ते विवातल्या एका विवाईतेचे मनोगत. नेमकं तेच छापून नाही आलं लोकसत्तेत. तिकडं राजकारण खूप. त्याला कोण काय करणार?
पण आम्ही ठरवलं की ते भाषण आपल्या ब्लॉगवर द्यायचंच.
तर ती विवाईता म्हणाली...

""अध्यक्षमहाराज, उपस्थित गुरूजन वर्ग आणि जमलेल्या मित्रमैत्रिणींनो, (ही शाळेतली सवय. लवकर नाही सुटत.) ऍक्‍चुअली यू नो, मला मराठीत टॉक द्यायची हॅबिट नाहीये. बट आयल ट्राय. मी खरंतर आज खूप हॅपी आहे. कारण की यू नो आयम अ बिग फॅन ऑफ सोनालीदीदी. त्यांच्या सगळ्या फिल्म मी पाहिल्यात. म्हणजे दिल चाहता है. त्यांच्या गेस्ट एडिटरशिपखाली मी काम करते. सो आयम हॅप्पी. खरं तर मी व्हर्नाक्‍युलरमध्ये येणारच नव्हते. पण कुमारअंकल, चंदू अंकल, सुधीर अंकल हे सगळे माझ्या डॅडचे फ्रेंड्‌स आहेत. तेव्हा डॅड म्हणाले, व्हाय डोंच्यू यू ट्राय इन लोकसट्टा. पॉकेटमनी तरी सुटेल. सो आय ऍग्रीड. शिवाय यू नो आयम व्हेरी सोशली कॉन्शस पर्सन. मग आय बिकेम पार्ट ऑफ विवा फॅमिली.''

येथून ती विवाईता सुटली, ते थेट तिच्या पहिल्या स्टोरीवर आली. ते फारच उद्‌बोधक होते. ती म्हणाली -
"ऍण्ड दॅट डे केम... समबडी टोल्ड मी की आय हॅव टू फाईल अ स्टोरी. म्हणाले, की मजकूर कमी पडतोय. मग मी खूप विचार केला. मग मी कुमारअंकलकडे गेले. ते म्हणाले, पाकिस्तानात सध्या हे चाललंय. क्‍युबात ते चाललंय. डायलेक्‍टिक मटेरियालिझम समजून घे आणि ज्वालामुखीच्या तोंडावर वाच. मला काही ते कळलं नाही, पण कुमारअंकल इज सो ग्रेट. मग मी चंदूअंकलकडे गेले. ते म्हणाले, चॉकलेट खाणार? आणि गुलाम अलीची नवी सीडी ऐकलीस का? आणि मग त्यांनी मला विद्यापीठातलं राजकारण सांगितलं. ही इज सो कूल ना. मग मी सुधीरअंकलकडे गेले, तेव्हा ते म्हणाले नमस्ते सदा वत्सले. मग मीही नमस्ते म्हणाले. मग त्यांनी मला सांगितले, की सोशली रिस्पॉन्सिबल स्टोरी कर. तेव्हा मग मी पुन्हा खूप विचार केला. तेवढ्यात रेश्‍मा टोल्ड मी, की पेपे जीन्सचं नवं कलेक्‍शन आलंय. तू पाहिलंस का? ऍण्ड इट वॉज लाईक लाईटनिंग स्ट्रक मी. आणि मग मी माझी आयुष्यातली पहिली स्टोरी विथ बायलाईन दिली - पेपे जीन्स बाजारात! इट वॉज ए व्हेरी सोशली रिस्पॉन्सिबल स्टोरी. एव्हरीबडी ऍप्रिसिएटेड इट.
आता माझी एकच अँबिशन आहे. मला की नाही सोनालीदीदीसारखी मोठी गेस्ट एडिटर बनायचंय. थॅंक्‍यू.

हे भाषण ऐकून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं म्हणतात. त्यावेळी बाहेरही आकाश गळत होतं. रामनाथजी गोयंका वर गदगदले असावेत.

1 comment:

Yogesh said...

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ!!!

काय मस्त उडवली आहे. :) लैच भारी